पुणे : प्रजासत्ताक दिन सप्ताहानिमित्त देशभर सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून, पुण्यातील तरुणांनी भारतातील दुग्धोत्पादन आणि बीफ निर्यात उद्योगातील परस्परसंबंधांवर लक्ष वेधले. पुणे ॲनिमल लिबरेशन या तरुण-नेतृत्वाखालील प्राणीहक्क संघटनेच्या वतीने जे.एम. रोडवरील संभाजी उद्यानात माहितीवर आधारित प्रभावी दृश्य प्रदर्शन सादर करण्यात आले.

भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असला, तरी त्याचवेळी तो बीफचा प्रमुख निर्यातदार देश असल्याकडे या प्रदर्शनातून लक्ष वेधण्यात आले. सरकारी व आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे २३० दशलक्ष टनांहून अधिक दूध उत्पादन, तर १.३ दशलक्ष टनांहून अधिक बीफ*ची निर्यात केली जाते. दुग्धोत्पादनाची यंत्रणाच अप्रत्यक्षपणे बीफ पुरवठा साखळीला चालना देत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

दूध देण्याची क्षमता कमी झाल्यानंतर किंवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर न राहिल्यानंतर जनावरांची विक्री केली जाते आणि त्यांना मांस उद्योगाकडे वळवले जाते. त्यामुळे डेअरी उद्योग आणि बीफ व्यापार हे स्वतंत्र नसून एकमेकांशी घट्ट जोडलेले असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

शहरांमध्ये रस्त्यावर आढळणाऱ्या जखमी, कुपोषित आणि दूध देणे थांबवलेल्या गायी हे याचे ठळक उदाहरण असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. पुण्यातील अनेक भागांत अशा गायी प्लास्टिकसह कचरा खाताना दिसतात, ही बाब गंभीर आणि चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात प्राणीहक्क कार्यकर्ते प्रवीण म्हणाले, “दूध देणे बंद झाल्यानंतर रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक गायी जवळच्या डेअरीमधूनच आलेल्या असतात, याची जाणीव बहुतांश नागरिकांना नसते. दूध आणि मांस उद्योगातील हा दुवा समजून घेण्यासाठी नागरिकांनी ‘माँ का दूध’ हा माहितीपट पाहावा.”

प्राणीहक्क कार्यकर्त्या श्वेता बोरगावकर म्हणाल्या, “दूध आणि मांस उद्योग वेगळे असल्याचा समाजात गैरसमज आहे. मात्र आकडेवारीनुसार हे एकाच साखळीचे भाग आहेत. जनावरे दुधासाठी उपयोगी न राहिल्यावर त्यांना मांस उद्योगात ढकलले जाते. या वास्तवाबाबत जनजागृती होणे अत्यावश्यक आहे.”

चेतन शिंदे यांनी सांगितले, “मांस उत्पादनाच्या ‘गुलाबी क्रांती’शिवाय दुग्धोत्पादनातील ‘धवल क्रांती’ शक्य नाही. दुधाची वाढती मागणी अशी जनावरे निर्माण करते, ज्यांची जबाबदारी अखेरीस कत्तल उद्योगावर येते. या दोन्ही उद्योगांकडे स्वतंत्रपणे पाहणे थांबवण्याची वेळ आली आहे.”

ठाणे, बंगळुरू, जयपूरसह देशातील इतर नऊ शहरांमध्येही गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अशीच दृश्य प्रदर्शने आयोजित करण्यात आली असून, डेअरी उद्योग आणि मांस व्यापारातील अतूट संबंधांवरील मौन तोडणे हा या देशव्यापी मोहिमेचा उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *