प्रतिनिधी , शुभांगी सरोदे पुरी-गोसावी
पुणे : महाराष्ट्राच्या सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाचा (SRPF) ७८ वा वर्धापन दिन जालन्यात उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. राज्य राखीव पोलीस मैदानावर आयोजित विशेष संचलन आणि थरारक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, जालन्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात SRPF नेहमीच मोलाची भूमिका बजावत असते. तसेच जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या काळात मदत आणि बचाव कार्यातही दलाने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला अप्पर पोलिस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, मुंबई तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ३ चे समादेशक यांच्यासह पोलीस अधिकारी व जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात दलाच्या जवानांनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनासह विविध कवायतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हाधिकाऱ्यांनी SRPF जवानांच्या सेवाभावी, धैर्यशील व कर्तव्यनिष्ठ कार्याचे विशेष कौतुक केले.