पुणे : रहाटणी परिसरात मध्यरात्री रिक्षा आणि चार दुचाकी पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनावरून परतल्यानंतर त्यांच्या घरासमोर उभी केलेली रिक्षा तसेच चार दुचाकींना आग लावल्याचे आढळून आले. नागरिकांच्या मदतीने व अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत रिक्षा आणि चारही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.

घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, आरोपी पेट्रोल ओतून वाहने पेटवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ही आगजनी किरकोळ वादातून, वैयक्तिक रागातून की परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आली, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
