पुणे : संविधानाचा आदर राखणे, त्याचे संवर्धन व संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असून २६ जानेवारी १९५० पासून लोककल्याणकारी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. याच दिवसाला भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन दख्खन इतिहास संशोधन संस्था, पुणेचे विश्वस्त खलील शेख यांनी केले.

येथील महावीर निवासी मुकबधीर विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, नाटिका आदी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरणही मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात हरिदास भन्साळी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय सुराणा होते. प्रमुख पाहुणे म्हणून कांतीलाल डाकलीया, संतोष कोचेटा, विशाल टाटीया, राजेश चोरडिया, अभय टाटीया, रेल्वे पोलिस उपनिरीक्षक रुपाली कदम आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता सपार, बी. एन. भालेराव, कविता पवार, मीनाक्षी वासनिक, जगदीश पवार, पत्रकार अमोल भोसले, पालक प्रतिनिधी, पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्मिता सपार यांनी केले. सूत्रसंचालन मीनाक्षी वासनिक यांनी केले, तर आभार बी. एन. भालेराव यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी उरुळी कांचन येथील सेव्हन स्टार ग्रुपच्या वतीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव व संविधानाबद्दलचा आदर अधिक दृढ झाला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.