पुणे : वनराई इको क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आंतरशालेय पर्यावरण विषयक चित्रकला स्पर्धा काल छत्रपती संभाजी महाराज उद्यान, बालगंधर्व रंगमंदिर परिसरात उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पुणे शहरातील ५० शाळांमधील १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेचे उद्घाटन वनराईचे सचिव अमित वाडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पर्यावरण जतन व संवर्धनात विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
वनराई पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. तसेच उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे स्वागत केले.
स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना वनराईतर्फे रंग, ब्रश, ड्रॉइंग शीट, पेन्सिल, खोडरबर व शार्पनर देण्यात आले. सकाळी १० ते ११.३० या वेळेत विद्यार्थी चित्रकलेत मग्न होते. पर्यावरण, जैवविविधता, शाश्वत शेती, नद्या व हरित शाळा या विषयांवर आधारित चित्रांनी संपूर्ण संभाजी उद्यान परिसर रंगून गेला होता.
मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे आणि त्यांच्या शाळांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांची कल्पकता आणि पर्यावरण विषयक जाणिवेला नागरिकांकडून दाद मिळाली.
येत्या फेब्रुवारी महिन्यात पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेतील निवडक चित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती वनराईतर्फे देण्यात आली.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण करणारी व सर्जनशीलतेला चालना देणारी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
