पुणे : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. शंकर उत्तम बडेकर यांनी उरुळी कांचन गटात आक्रमक भूमिका घेत थेट जनतेसमोर स्पष्ट शब्दांत आपली दिशा मांडली आहे. “पाणी, रस्ते, लाईट, आरोग्य, महिला आणि वृद्धांच्या अडचणी मला कागदावरून नाही, तर रोजच्या जगण्यातून कळतात,” असे सांगत बडेकरांनी विकासाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पिण्याचं पाणी हा मूलभूत हक्क आहे, तो वेळेवर मिळालाच पाहिजे, असे ठामपणे सांगत त्यांनी पाणीप्रश्नावर सरकार आणि प्रशासनाला थेट संदेश दिला. रस्त्यांबाबत बोलताना “आता सबबींचा काळ संपला आहे. वाडी-वस्तीपर्यंत पक्के रस्ते झालेच पाहिजेत. खड्यांमुळे अपघात होता कामा नये आणि शेतकऱ्यांचा माल बाजारात नेणं सोपं झालंच पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
रात्रीच्या सुरक्षिततेवर भाष्य करताना बडेकर म्हणाले, प्रत्येक रस्ता, चौक आणि वस्तीमध्ये स्ट्रीट लाईट लागतील. बंद लाईटची तक्रार वेळेत सुटलीच पाहिजे. महिलांना आणि मुलींना सुरक्षित वाटलं पाहिजे, हे माझं प्रामाणिक वचन* आहे”*

ज्येष्ठ नागरिकांबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “आयुष्यभर कष्ट केलेल्या ज्येष्ठांना योजनांसाठी हेलपाटे मारायला लागू नयेत. आरोग्य तपासणी शिबिरे, पेन्शन आणि सरकारी योजनांसाठी एकाच ठिकाणी सेवा मिळेल, अशी यंत्रणा उभी करणार,” असे त्यांनी सांगितले.
महिलांच्या सशक्तीकरणावर भर देताना बडेकर म्हणाले, “महिला सक्षम झाल्या तर गाव उभं राहतं.” बचत गटांना भांडवल, प्रशिक्षण, मुलींच्या शिक्षणाला मदत आणि तक्रारींवर तात्काळ कारवाई ही फक्त घोषणा नसून आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

शेतकऱ्यांसाठी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली—पाणी, वीज आणि रस्ते शेतकऱ्याच्या दारापर्यंत पोहोचलेच पाहिजेत, शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि नुकसानभरपाई वेळेत मिळाली पाहिजे. “यासाठी मी थांबणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
तरुणांसाठी स्थानिक रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, खेळाची मैदाने आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध करून देण्यावर भर देत “नोकरीसाठी शहराकडे धाव घ्यायची गरज पडू नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य, स्वच्छता आणि पारदर्शकतेवर भाष्य करताना बडेकर म्हणाले, “प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत केली जाईल, स्वच्छ पाणी, स्वच्छ रस्ते आणि कचरा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी उपाय राबवले जातील. प्रत्येक विकासकामाचा हिशोब जनतेसमोर मांडला जाईल.”

“हे फक्त आश्वासन नाही, ही माझी जबाबदारी आहे—गावासाठी उभं राहण्याची आणि गाव घडवण्याची,” असे सांगत शंकर बडेकर यांनी उरुळी कांचन गटात आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *