पुणे : वाढदिवस म्हटला की केक, फुगे आणि खर्चिक जल्लोष अशी सर्वसाधारण कल्पना असते. मात्र पांढरस्थळ व कोरेगावमुळ परिसरात वाढदिवस सामाजिक जाणीवेने साजरा करत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला.
किरण भंडारी आणि समाधान अवचट यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरस्थळ तसेच कोरेगावमुळ येथील दासवे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पेन, वही, पेन्सिल व अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. साहित्य हाती पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि डोळ्यांतील चमक उपस्थितांना समाधान देऊन गेली.

दासवे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक गणेश मेमाणे यांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. “माझ्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात प्रथमच अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप होताना पाहिले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. पालकांनीही आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करावे,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
मुख्याध्यापिका वैशाली खामकर, सौ. जैबुन बागवान यांच्यासह शुभम काळे, हरिश कांचन, हरिश भिवाजी कांचन, समाधान वाघमारे, नितीन लोंढे, खलिलभाई शेख, केतन पवार, अमित कांबळे, सतिश कांचन, पत्रकार सुवर्णा कांचन, अमोल भोसले, सुनील तुपे तसेच बापुराव चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.