रामभाऊ आवारे, प्रतिनिधी
निफाड : समाजाची धारणा, राष्ट्राचे स्थैर्य आणि स्वातंत्र्य हे केवळ राजसत्तेवर अवलंबून नाही, तर संस्कारांवर अवलंबून आहे. संस्कार विस्कळीत अथवा नाहीसे झाले, तर समाज भरकटत जाईल हे संतांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी समाजात सुसंस्कारांचे बीज पेरले. त्याला उच्च नैतिकतेचे खतपाणी घातले. सांस्कृतिक अभंगता हे आपल्या देशाचे बळ आहे, सामर्थ्य आहे. ही अभंगता भंग करण्याचा प्रयत्न चालला आहे. तरी संस्कृती आणि धर्माच्या रक्षणाचा वसा घेतलेले व्रतस्थ धर्म रक्षकच राष्ट्राचे खरे वीर आहेत. त्यामुळे ‘व्रतस्थ धर्मरक्षक’ हे दोन शब्द दैनिक ‘सनातन प्रभात’च्या शीर्ष भागी दोन धर्म ध्वजांच्या मध्ये झळकते आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ विचारवंत श्री. दुर्गेश परुळकर यांनी काढले.

२२ मार्चला शंकराचार्य न्यास संकुल, डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्तीचा २६ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. त्या प्रसंगी मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.अत्यंत उत्साहपूर्ण आणि चैतन्यदायी अशा या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक, मान्यवर, उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर वेदमंत्रपठण पुरोहित नितीन घाटे आणि सर्वेश पोळ यांनी केले. ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन डॉ. सुजित कोशिरे यांनी केले.
दुर्गेश परुळकर पुढे म्हणाले ,राजकीयदृष्ट्या देश पारतंत्र्यात गेला, तरी सांस्कृतिकदृष्ट्या भारत एकसंध राहिला म्हणून पारतंत्र्यात राहूनही भारत राष्ट्र म्हणून जिवंत होते.आजच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातच नव्हे तर सर्व क्षेत्रात व्यक्ती जीवन निष्ठाहीन, श्रद्धाहीन, चारित्र्यहीन, आदर्शहीन झालेले आढळून येते. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धुडगूस घातला जात आहे. त्यामुळे माणुसकीच लोप पावत चालल्याचे भयानक दृश्य स्पष्ट होत चालले आहे. या सर्व प्रिय गोष्टींना नष्ट करून मानवी समाजात नवचैतन्य निर्माण करून पूर्वीची नैतिकता, निष्ठा, चारित्र्य, आदर्शाचा सुकाळ निर्माण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणार्या व्रतस्थ युवकांची फौज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे दैनिक म्हणून ‘सनातन प्रभात’कडे आपण अंगुली निर्देश करू शकतो.परिवाराचे, समाजाचे, राष्ट्राचे, धर्माचे, संस्कृतीचे आपल्यावर ऋण आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी व्रतस्थ जीवन जगणे क्रमप्राप्त आहे. या व्रतस्थ जीवनाची दिक्षा देणारे दैनिक म्हणजे सनातन प्रभात आहे.

राष्ट्र आणि धर्मरक्षणाच्या लढाईतील अग्रगण्य सेनापती म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय !* – – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था ‘सनातन प्रभात’चा वाचक हा केवळ वाचक न रहाता तो कार्यकर्ता, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, साधक, संत या उन्नतीच्या टप्प्याने जातो. ‘सनातन प्रभात’ वाचून अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठांनी साधना करण्यास प्रारंभ केला. सनातन प्रभात हे हिंदूंचे मुखपत्र असून ते हिंदू संघटनांचे हक्काचे व्यासपीठ आहे. आज अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या चळवळींना वैचारिक बळ पुरवण्याचे काम सनातन प्रभात करत आहे. सनातन प्रभात केवळ राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात मांडून थांबत नाही, तर त्या संदर्भात काय कृती करणे अपेक्षित आहे, या संदर्भातील दिशादर्शन करते. कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय हिंदूंवरील आक्रमणांविषयी अत्यंत निर्भिडपणे, स्पष्टपणे जागृती सनातन प्रभात अव्याहतपणे करत आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्मरक्षणाच्या लढाईतील अग्रगण्य सेनापती म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय !
सनातन प्रभात’ केवळ वर्तमानपत्र नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रारंभ केलेली वैचारिक क्रांती आहे !* – अजय केळकर, विशेष वरिष्ठ प्रतिनिधी, सनातन प्रभात ‘सनातन प्रभात’ केवळ वर्तमानपत्र नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रारंभ केलेली वैचारिक क्रांती आहे. ‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक आंदोलक झाले आहेत. देव, देश आणि धर्म यांसाठी ते रस्त्यावर येऊन वैध आंदोलनाला उभे रहात आहेत. ‘सनातन प्रभात’ने आरंभलेल्या वैचारिक आंदोलनामुळे आज परिस्थिती पालटत आहे ! संसदेतही ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी ऐकू येत आहे ! ही ‘सनातन प्रभात’ने आरंभलेल्या वैचारिक आंदोलनाची केवळ फलश्रुती नाही, तर एका क्रांतीची नांदी आहे.सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा सत्कार डॉ. किशोर गांगुर्डे यांनी, दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेष वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा सत्कार श्री. आदित्य शर्मा यांनी, श्री. दुर्गेश परुळकर यांचा सत्कार श्री. शशिकांत कोथमिरे यांनी केला. सूत्रसंचालन श्री. अमोल शिंदे आणि सौ. वंदना सराफ यांनी केले.