दत्तात्रय आसवले, प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रमेश फिरोदिया कला, वाणिज्य विज्ञान व महाविद्यालय साकूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकात्म मानव दर्शन’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात उत्साहात पार पडले.

कार्यक्रमासाठी डॉ. श्रीनिवास भोंग हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी ‘एकात्म मानव दर्शन’चे प्रणेते दिनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची सखोल मांडणी केली. ते म्हणाले, “एकात्म मानव दर्शन ही केवळ राजकीय संकल्पना नसून ती भारतीय संस्कृतीवर आधारित जीवनदृष्टी आहे. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा समतोल साधत सर्वांगीण विकास घडविणे हा या तत्त्वज्ञानाचा मूलाधार आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आत्मनिर्भरता, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकी यांची जपणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना उपाध्याय यांच्या विचारांचा अभ्यास करून समाजजीवनात त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. हेमलता राठोड होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांचा जीवनपरिचय उलगडून सांगितला आणि विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित केली. उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप यांनी ‘एकात्म मानव दर्शन’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे साधन आहे.”

यावेळी व्यासपीठावर विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रंजित गिरी, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. शबाना शेख, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा. गणेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘एकात्म मानव दर्शन’ उपक्रमाच्या निमित्ताने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत ६७ विद्यार्थ्यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत ५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा. ज्योती वडीतके, प्रा. मनीषा त्रिभुवन व प्रा. वैशाली गायकर यांनी केले; तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रवीण मिसाळ, प्रा. मुस्ताक सय्यद व प्रा. जिजाबाई वाघमोडे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. म्हतू खेमनर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सागर गोसावी यांनी करून दिला. सूत्रसंचालन कला विभाग प्रमुख प्रा. कल्पना शेळके व बहिशाल केंद्र कार्यवाहक प्रा. पोपट खेमनर यांनी केले. आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. रणजीत गिरी व प्रा. संदीप खेमनर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गणेश कुलकर्णी, प्रा. दत्तात्रय आसवले, प्रा. दीपक मेंगाळ, प्रा. जया रकटे, प्रा. प्रियांका हाके, प्रा. कल्याणी शिंदे, प्रा. पल्लवी वाणी, प्रा. अश्विनी वाणी, प्रा. मोहिते मॅडम, प्रा. चेतन लहामगे, प्रा. आरजु शेख तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *