पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कस्तुरबा मातृ मंडळातर्फे “मन जिंकलं तर जग जिंकता येतं” या विषयावर आयोजित प्रेरणादायी व्याख्यानाने परिसरातील महिलांच्या मनात आत्मविश्वासाचा नवा किरण उजळवला. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, वातावरण प्रेरणादायी विचारांनी भारावून गेले होते.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अंतर्गत शक्तीला जागृत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रमुख वक्त्या ॲड. अश्विनी सचिन जगताप यांनी आपल्या ओजस्वी व प्रभावी वक्तृत्वातून जीवनातील सकारात्मकता, आत्मविश्वास आणि ध्येयसाधनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना आत्मपरीक्षणाची आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाला आहारतज्ञ शोभा इंदानी, अध्यक्षा अलका साळुंखे, शुभताई मोघे, मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा देविदास भन्साळी, सुशीला मेटे, जयश्री बेदरे, मीनल फुलपगार, संगिता भालके, रश्मी कुलकर्णी, आशा कांचन, अनिता चौधरी, प्रिया बलदोटा, छाया नहार, राजश्री शितोळे, स्वाती चौधरी, उज्वला लोखंडे तसेच जेष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन, उरुळी कांचन पतसंस्थेचे चेअरमन देविदास भन्साळी, सरपंच मिलिंद जगताप, राजाराम कांचन, महादेव कांचन, एकनाथ चौधरी, जयप्रकाश बेदरे, अशोक सावंत, शिवाजी कांचन, आबासाहेब टिळेकर, हरिदास भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याच्या निमित्ताने महिलांसाठी निबंध, गुणदर्शन आणि पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आपली कला आणि कौशल्य सादर केले. या प्रसंगी प्राचार्य राजकुमारी लक्ष्मी यांना ‘आदर्श नारी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
सुरेखा भन्साळी यांच्या नेतृत्वाखाली कस्तुरबा मातृ मंडळाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने राबविलेल्या उपक्रमांची ही आणखी एक यशस्वी पायरी ठरली. या कार्यक्रमामुळे महिलांना स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळाली असून, आत्मविकासाच्या दिशेने सकारात्मक वाटचाल करण्याची उर्मी निर्माण झाली आहे. हा उपक्रम महिलांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरला.