बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : वळती (ता. हवेली) येथे गंभीर मारहाणीची घटना उघडकीस आली असून चार जणांविरुद्ध उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरविंद मच्छींद्र कुंजीर (वय ५०, रा. वळती, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी संभाजी एकनाथ कुंजीर, शैला संभाजी कुंजीर, दिनेश शांताराम म्हस्के, उमेश शांताराम म्हस्के यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या शेतातील मिरचीच्या रोपांना पाणी देत असताना ही घटना घडली.
पूर्वीच्या बांधावरील झाडांच्या वादातून संभाजी एकनाथ कुंजीर यांनी फिर्यादींचा गळा पकडला. त्याचवेळी शैला संभाजी कुंजीर (हातात विळा), दिनेश शांताराम म्हस्के (हातात कोयता) आणि उमेश शांताराम म्हस्के (हातात गज) हे तिघे घटनास्थळी आले.
दिनेश म्हस्के यांनी कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चुकून फिर्यादींच्या नाकावर लागला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादींना खाली पाडून स्क्रूड्रायव्हर, विळा व गजाने छाती, हात आणि कंबरेवर मारहाण केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून “जिवे मारून टाकू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादींनी सांगितले.
फिर्यादी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक करत आहेत.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८०/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.