
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : गावातील नागरिक, विद्यार्थी तसेच भाविकभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने थेऊर येथील प्रमुख रस्त्यांवर सहा ठिकाणी नवीन गतिरोधक बसविण्यात आले आहेत. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकारातून ही कामे पूर्ण करण्यात आली असून, यामुळे गावातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गावातील विविध भागांमध्ये वाहनांचा वाढता वेग आणि त्यातून निर्माण होणारे अपघाताचे धोके याबाबत नागरिकांकडून सातत्याने चिंता व्यक्त केली जात होती. विशेषतः शाळा परिसर, मंदिर परिसर तसेच गर्दीच्या रस्त्यांवर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे पालन होत नसल्याने नागरिकांनी गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत युवराज काकडे यांच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर सहा ठिकाणी गतिरोधकांची उभारणी करण्यात आली.

यामध्ये चिंतामणी विद्या मंदिराजवळील रस्ता तसेच अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणी गणपती मंदिराकडे जाणाऱ्या तीन प्रमुख मार्गांवर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. या मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणावर भाविकभक्तांची वर्दळ असते.

त्याचबरोबर स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांची ये-जा देखील मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहतुकीचा वेग नियंत्रित ठेवणे आवश्यक बनले होते.
नवीन गतिरोधकांमुळे वाहनांचा वेग कमी राहण्यास मदत होणार असून, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासात याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

गावातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
युवराज काकडे यांनी सांगितले की, गावाच्या विकासाबरोबरच नागरिकांची सुरक्षितता हे देखील प्रशासनाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. शाळा, मंदिर आणि गर्दीच्या भागांमध्ये अपघात टाळण्यासाठी गतिरोधकांची आवश्यकता होती.

नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुढील काळातही गावातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.
दरम्यान, वाहनचालकांनी गतिरोधकांच्या ठिकाणी वाहनांचा वेग कमी ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहनही युवराज काकडे यांनी केले आहे. या उपक्रमामुळे थेऊर गावातील रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक