सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : ढोल-ताशांचा निनाद, भगवी पताका, पहाडी आवाजातील गगनभेदी शिव-शंभू गर्जना तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, ‘जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे!’ आणि ‘नमो पार्वती पते, हर हर महादेव’ या घोषणांच्या जयघोषात एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एडीटी) विद्यापीठात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

एमआयटी एडीटी विद्यापीठातील उर्मिलाताई कराड सभागृहात प्रतिमापूजन, शिव-शंभू गर्जना आणि विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या व्याख्यानाद्वारे स्वराज्याचे धाकटे छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, डॉ. नचिकेत ठाकूर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिवराय ढोल-ताशा पथकातील सदस्यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. व्याख्यानानंतर सभागृहात ‘छावा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले. चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील प्रसंग मोठ्या पडद्यावर अनुभवताना विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, तर चित्रपटाचा शेवट पाहताना सभागृहातील वातावरण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत आहेत. शिवरायांनंतर स्वराज्यावर आलेली संकटांची मालिका छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थपणे पेलली. छत्रपती झाल्यानंतर त्यांनी पुढील नऊ वर्षे अविरतपणे असंख्य लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या. त्यांच्या चिवट प्रतिकारामुळे औरंगजेबाचे बलाढ्य सैन्यही हतबल झाले. त्यामुळे इतिहासातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या पराक्रमामुळेच महाराष्ट्रधर्म टिकला आणि वाढला,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बापुराव चौधरी उपसंपादक