सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीच्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस व त्याच्या पत्नीला मारहाण झाल्याची घटना उरुळी कांचन येथील बगाडेवस्ती परिसरात घडली.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश विलास ननावरे (वय ३८, रा. बगाडेवस्ती, प्रयागधाम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) हे शनिवारी (ता. ९) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या लेडीज शॉपी दुकानात काम करत होते.

त्यावेळी वडिलोपार्जित जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीशी वाद घातला.

या प्रकरणातील आरोपींमध्ये अर्थव गणेश ननावरे, प्रथमेश गणेश ननावरे, गणेश विलास ननावरे, आदित्य शरद कदम, दिपाली शरद कदम आणि अलका गणेश ननावरे यांचा समावेश आहे. आरोपींनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीस हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच आरोपी आदित्य शरद कदम याने सिमेंटच्या डंबेल्सने फिर्यादीच्या नाकावर मारून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 110/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 117(2), 115(2), 189(1)(2), 191(2), 190, 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करीत आहेत.
बापुराव चौधरी उपसंपादक