बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेत लोणी काळभोर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजने उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा एकूण २७४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

त्यामध्ये वाणिज्य शाखेतील ११५, विज्ञान शाखेतील १५३ आणि कला शाखेतील ६ विद्यार्थ्यांचा समावेश होता.

वाणिज्य शाखेत अल्वीरा बागवान हिने ९५ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. जोएल मास्करनेस आणि संस्कार गांधी यांनी प्रत्येकी ९२.३३ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे द्वितीय स्थान मिळवले.

विज्ञान शाखेत अश्लेषा मंडाले हिने ८५.८३ टक्के गुणांसह प्रथम येत आघाडी घेतली. श्रेया काळभोर हिने ८५.६७ टक्के गुणांसह द्वितीय, तर निशा नागवडे हिने ८४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेत श्रीयुक्ता काकुमणी हिने ८७ टक्के गुण मिळवत प्रथम स्थान पटकावले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे, ज्युनिअर कॉलेजच्या प्रकल्प संचालिका डॉ. ज्योती जोतवानी आणि प्राचार्या रिपल शर्मा यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
महाविद्यालयाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळेच हे यश शक्य झाल्याचे प्राचार्या रिपल शर्मा यांनी सांगितले.